रत्नागिरी : ‘सध्या माणसातील मानसिक विकृती नष्ट करण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे संगोपन करताना मुलींबरोबर मुलांनाही कसे वागले पाहिजे, हे सांगतानाच सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या मुला-मुलींशी मैत्रीचे नाते जपणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन आमदार तथा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी नगरपालिकेतर्फे येथील मराठा मैदानावर कन्या-माता सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती स्मितल पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, बांधकाम समिती सभापती रशिदा गोदड, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रद्धा हळदणकर, समाजकल्याण समिती सभापती वैभवी खेडेकर, नगरसेविका राजेश्वरी शेट्ये, शिल्पा सुर्वे, उज्ज्वला शेट्ये, दिशा साळवी, मिरा पिलणकर, अस्मिता चवंडे, फरहा पावसकर, कौशल्या शेट्ये, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सामंत म्हणाले, ‘रत्नागिरी नगरपालिकेने आयोजित केलेला हा कन्या व माता यांच्यातील सुसंवादासाठीचा मेळावा रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील अभिनव उपक्रम आहे. मुलींबाबतच्या जाणीव जागृतीसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याप्रमाणेच नगरपालिकेने मुलांनीही कसे वागले पाहिजे यासाठीही भविष्यात आयोजन करावे.’
नगराध्यक्ष पंडित यांनी बदलत्या काळात कन्या-माता यांच्यातील सुसंवाद अत्यावश्यक असल्याची गरज नमूद करतानाच आधुनिक युगात मुलींनी अधिक कणखर बनण्याची गरज अधोरेखित केली.
प्रास्ताविक करताना उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर यांनी पुढील टप्प्यात मुली- मुलगे व माता-पिता यांचा एकत्रित सुसंवाद मेळावाही आयोजित करणार असल्याचे सांगितले. वयात येणार्या मुलींच्या बदलणार्या मानसिक भावविश्वासाचा उलगडा स्त्रीरोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी केला. न्यायाधीश आनंद सामंत यांनी मुली व मातांनी वाईट प्रवृत्तींविरोधात आवाज उठविण्याची गरज व्यक्त केली. प्राचार्य मंजिरी साळवी यांनी सक्षम पालकत्वात समाज आणि पालकांची जबाबदारी विशद करताना आईची विशेष जबाबदारी उपस्थितांसमोर मांडली. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी वयात येणार्या मुलींचा आहार व आरोग्य याबद्दल मातांना उद्बोधित केले.
सूत्रसंचालन मंजिरी लिमये यांनी केले. नगरसेविका हळदणकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण समितीने विशेष परिश्रम घेतले.